बांधकाम अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि मयत झालेल्या कुटूंबाला योग्य न्याय मिळावा :-लोकसेवक युवराज दाखले संस्थापक शिवशाही व्यापारी संघ

बांधकाम अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि मयत झालेल्या कुटूंबाला योग्य न्याय मिळावा :-लोकसेवक युवराज दाखले संस्थापक शिवशाही व्यापारी संघ
मावळ:- 16/06/25 , प्रतिनिधी,(माझा इंडिया न्यूज) जवळपास एक वर्षापूर्वी मावळमधील इंद्रायणी नदीवरील पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर होऊनही, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही, ही चिंताजनक बाब आहे. ११ जुलै २०२४ रोजी या पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे शासकीय पत्रात नमूद आहे, तरीही आता १५ जून २०२५ पर्यंत कोणतीही प्रगती दिसून येत नाही. या दिरंगाईबद्दल महाराष्ट्र सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात.
महाराष्ट्र सरकारची अनास्था की प्रशासकीय दिरंगाई? पर्यटक आणि सामान्य नागरिकांच्या मृत्युला जबाबदार महाराष्ट्र सरकार व प्रशासन ?
एक वर्ष उलटूनही काम का झाले नाही? निधी मंजूर होऊनही वर्षभरात कामाला सुरुवात न होणे हे प्रशासकीय अनास्था दर्शवते. केवळ कागदावर निधी मंजूर करून काय उपयोग, जर तो प्रत्यक्षात कामात येत नसेल तर?
पुलाचे टेंडर निघाले होते का? सुत्रांच्या माहिती नुसार, अद्याप निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. जर निधी मंजूर झाला असेल, तर तातडीने निविदा काढून कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. निविदा न काढण्यामागे काय कारणे आहेत?
मंजूर निधीचे पेमेंट झाले आहे का? निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी, त्याचे प्रत्यक्ष वाटप (पेमेंट) झाले आहे का, हे देखील स्पष्ट झालेले नाही. जर निधीचे पेमेंटच झाले नसेल, तर कामाला सुरुवात कशी होणार? हा निव्वळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे का?
कुंडमळा दुर्घटना आणि सरकारची उदासीनता: गेल्या काही वर्षांपासून या पुलाची मागणी होती आणि पावसाळ्यात पूर आल्यास होणारी वाहतूक विस्कळीत होण्याची समस्या नागरिकांना माहीत होती. जर हा पूल वेळेत बांधून पूर्ण झाला असता, तर कुंडमळा येथे पर्यटकांना जीव गमवावे लागले नसते, असे म्हटले जात आहे. अशा दुर्घटनांनंतरही सरकार जागे होत नसेल, तर हे दुर्दैवी आहे.
भाजपा मावळ तालुका अध्यक्ष श्री. रवींद्र भेगडे यांनी पाठपुरावा केला नाही का? ज्यांना उद्देशून हे पत्र काढण्यात आले होते, त्यांनी या कामाच्या प्रगतीसाठी काय पाऊले उचलली? केवळ निधी मंजूर करवून घेणे पुरेसे नाही, तर त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणेही आवश्यक आहे.